सोमवार, २८ सप्टेंबर, २०१५

शिक्षकांचे संवाद कौशल्य

काही शिक्षक हे दिसायला अगदी साधारण असूनही विद्यार्थ्यांमध्ये मात्र अत्यंत प्रिय असतात. विद्यार्थी त्यांच्या येण्याची, त्यांच्या तासिकेची आतुरतेने वाट पाहत असतात. तर काही शिक्षक हे अत्यंत हुशार असूनही विद्यार्थ्यांमध्ये मात्र तितकेसे प्रिय नसतात. याचे प्रमुख कारण म्हणेजे शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी असलेला संवाद. उत्तम संवाद कौशल्य असलेले शिक्षक हे विद्यार्थ्यांचे मन जिंकून घेतात. त्यांना समजून घेऊन त्यांचं मार्गदर्शन करतात आणि म्हणूनच त्यांच्यात ते प्रिय असतात. उत्तम संवाद कौशल्य ही एक कला आहे. तो एक प्रकारचा वशीकरण मंत्राच आहे.
शिक्षकी पेशात तर उत्तम संवाद कौशल्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विद्यार्थी दशेतील विविध काळात शिक्षक आपल्या संवाद कौशल्याने विद्यार्थी कसे सांभाळतात, घडवतात याचा थोडक्यात विचार करू.
लहानपण/बालवाडी: मूळ जेव्हा पहिल्यांदा आपल्या आई, वडील आणि कुटुंबियांच्या प्रेमळ कुशीतून घराबाहेर पडते आणि बालवाडीत जाऊ लागते तेव्हा त्याची समाजातील इतर घटकांशी ओळख करून देण्याचे काम बालवाडी शिक्षिकाच करत असते. याच ठिकाणी त्या बाळाला मित्र आणि शत्रूंची ओळख होते! त्याला समाजात कसे वागावे याचे धडे प्रथमतः येथेच त्याची बाई त्याला देत असते. बालवाडीतील बाईला या सर्व मुलांची आईच होऊन राहावे लागते. त्यांचे रडणे, हसणे, धिंगाणा घालणे सर्वच पहावे लागते. या वेळी जर त्या बाई जवळ या मुलांशी कसा संवाद साधावा आणि कशाप्रकारे त्यांना आपलेसे करून घ्यावे याचे कौशल्य नसेल तर त्या मुलांचा त्या बालवाडीत जीव लागत नाही. मग ती तेथे जाने टाळतात. याउलट जर ती बाई त्या मुलांना गोड बोलून चांगले सांभाळत असेल तर अनेक ठिकाणी मुलं त्याच बाई हव्यात म्हणून आग्रह करतांना दिसून येतात.
माध्यमिक-उच्चमाध्यमिक: हा काळ विद्यार्थ्यांच्या पायाभरणीचा काळ मनाला जातो. या वेळी प्रत्येक विषयातल्या त्यांच्या पायाभूत संकल्पना स्पष्ट होणे महत्त्वाचे असते. शिक्षकांनी चांगल्या संवाद कौशाल्याद्वारे सोप्या भाषेत विध्यार्थ्यांना विषय समजावून सांगितला तर पुढे आयुष्यभर तो त्याला नीट लक्षात राहतो. तो आपल्या मुलांना, विध्यार्थ्यांनाही तो नीट समजावून सांगू शकतो. शिक्षकांमुळेच या काळात शिक्षणाची गोडी लागते वा त्याबद्दल तिटकारा निर्माण होतो. माध्यमिक शिक्षकाची जबाबदारी फार मोठी आहे. विद्यार्थ्यांबरोबरच ते देशही घडवत असतात. यामुळे त्यांचे संवाद कौशल्य अति उत्तम असणे अत्यंत आवश्यक ठरते. 
पदवी-पदव्युत्तर: या काळात विद्यार्थ्यांची वैचारिक बैठक पक्की करण्याचे काम प्राध्यापकांवर असते. ते विद्यार्थ्यावर कसा प्रभाव टाकतात हे येथे अत्यंत महत्त्वाचे आहे. या कला विद्यार्थी प्रत्यक्ष संवादाव्यतिरिक्त प्राध्यापकांच्या वागण्या-बोलाण्यावारुनही बऱ्याच गोष्टी शिकत असतात. तेव्हा या क्षेत्रातील शिक्षकांचे संवाद कौशल्य हे सूक्ष्म पातळीवरही उत्तम असायला हवे. त्यांनी विद्यार्थ्यांशी आपुलकीचे संबंध जोपासावे. त्यांना उत्तम चारित्र्याचे, मर्यादा पालनाचे शिक्षण आपल्या वागण्यातून द्यावे.
अशाप्रकारे विद्यार्थी दशेतील सर्वच पातळ्यांवर शिक्षक हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बाजावत असतात. त्यांचा विद्यार्थ्यांशी  असलेला उत्तम संवादच विद्यार्थ्यांची सामाजिक, नैतिक आणि आर्थिक उन्नती घडवून आणू शकतो. विद्यार्थ्यांचे वाईट सवयींपासून संरक्षण करू शकतो आणि त्यांच्या जीवनाचे सार्थक करू शकतो.

Popular Posts

शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण

 शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण  DOWNLOAD